‘टायगर अभी जिंदा है’!
मुंबई, दि. 23 ऑक्टोबर:
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार बॅटींग केली.
जयंत पाटील म्हणाले,’विधानसभेच्या सभागृहात मी भाजप नेत्यांना ‘कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा’ हा प्रश्न केला होता. आजही ते टिव्ही बघत असतील आणि त्यांना आता कळेल ‘टायगर अभी जिंदा है’ आणि ‘पिक्चर अभी बाकी है’.
एकनाथ खडसे यांनी सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. मात्र त्यांना भाजपाने मागच्या रांगेत बसवण्याचे काम केले. सुसंस्कृत महाराष्ट्रात जाणीवपूर्वक चांगलं राजकारण चव्हाणसाहेबांनी रुजवलं परंतु आज राजकारणातून संपवण्याचे राजकारण घडत आहे याबाबत जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.
पवारसाहेबांनी घडवलेले नेते ऐन निवडणुकीत पक्षाला सोडून गेले. परंतु पवारसाहेबांचा विचार मानणारे कार्यकर्ते त्यांच्यामागे उभे राहिले आणि त्यांचे विचार पुढे महाराष्ट्र स्वीकारेल हे आज सिद्ध झाले.पवारसाहेबांच्या अपार कष्टाने आज पक्ष आणि पक्षातील तरुण कार्यकर्ते उभे राहिले आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करणारा हा पक्ष आहे. सुख दुःखात धावुन जाणारा पक्ष आहे. पवारसाहेब ही पक्षाची ताकद आहे. जिव्हाळाच्या या पक्षात तरुणांना संधी दिली जाते. महाराष्ट्र उभा करायचा म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर पवारसाहेबांनी त्यावेळी जबाबदारी टाकली ती जबाबदारी आम्ही पेलल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजप पक्ष वाढवण्याचे काम खडसे यांनी केले आहे. काही कानामागून आले आणि तिखट झाले असा प्रकार घडला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
