तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलो आहोत!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा.
सोलापूर, दि. १९ ऑक्टोबर :
नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव आषिश कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.
