…. तोपर्यंत मास्क हीच लस !
मुंबई, दि. १८ ऑक्टोबर:
कोरोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता राखण्याची शपथ सर्वांनी घ्यावी. कोरोना वरील लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी उत्तम लस ठरणार आहे याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरेपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे ऑनलाइन प्रद्धतीने उद्घाटन केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा असतो हे शिकवण्याची गरज नाही. कोरोनाची दुसरी लाट येऊ न देणे ही आपली प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती एका महिन्यात दोनदा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते त्यामुळे येत्या काळात मृत्यू दरही कमी होईल. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने केलेले काम कौतुकास्पद आहे. आगामी काळात जनजागृती करुन कोरोना रुग्णांची घसरती संख्या आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की, मास्क, सुरक्षित अंतर, आणि हाताची स्वच्छता याबाबत जनजागृती करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
