हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव!
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर:
ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ तर लागणारच आहे शिवाय सरकारी तिजोरीवरही ताण येणार आहे . कारशेड कांजूरमार्गला हलवून मेट्रो ३ चे प्रश्न सुटणार नाहीत शिवाय मेट्रो ३ आणि ६ अशा दोन्ही मेट्रोंच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणतात,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव! टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली, पण कार डेपो ४-५ वर्ष असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर. वाढीव किंमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसुल होणार!
‘पर्यावरणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा मी सन्मानच करतो पण आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. पण आता हेच पर्यावरणवादी मिठागराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेड उभारली जाण्याचे समर्थन करणार का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
