कारशेड हलविण्याचा निर्णय केवळ अहंकारातून!
मुंबई, दि. 12 ऑक्टोबर:
ठाकरे सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा घेतलेला निर्णय अर्थातच भाजपाला आवडलेला नाही. या निर्णयावर ठाकरे सरकार टीकेची तोफ डागली जात आहे. या निर्णयामुळे 4 हजार कोटी रुपयांनी मेट्रोचा खर्च वाढणार असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी विलंब लागणार आहे असा भाजपाचा आरोप आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारशेड हलविण्याच्या मुद्द्यावर म्हणतात की, ‘कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.
आरेच्या कारशेडसाठी 400 कोटी आधीच खर्च झालेले, स्थगितीमुळे 1300 कोटी पाण्यात गेले. शिवाय 4000 कोटींचा वाढीव भार. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार. आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार, आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठी ही दिशाभूल.’ असे फडणवीस म्हणाले.
