उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फुट!
मुंबई, दि. १६ जून २०२६.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता पुन्हा महाराट्रातही ऑपरेशन टायगर होत असल्याची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा भगदाड पाडण्याचे काम सुरु असल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी खासदारांची एक बैठक बोलावली होती पण बैठकीला नऊपैकी पाच लोकसभा खासदारांनी दांडी मारली, ज्यामुळे पक्षात फूट पडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.
‘यूबीटी’ (UBT) गटाने या खासदारांनी बैठकीत ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतल्याचा दावा केला असला, तरी ठाकरे यांना केवळ आष्टीकर यांच्याशीच थेट संवाद साधल्याचे समजते. दरम्यान, बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे गटातील एका मंत्र्यासोबत गुप्त बैठक घेतल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले.
फोडाफोडीच्या या राजकारणावर टीएमसी खासदार कीर्ती आझाद म्हणाले, “आता अशी चर्चा आहे की महाराष्ट्रातही एखादे ‘ऑपरेशन’ होणार आहे. हा भाजपचा खेळ आहे. याची सुरुवात जनता दल (सेक्युलर) पासून झाली होती आणि तेव्हा ते गुप्तपणे घडत होते. परंतु १२ वर्षांत राजकारणातील नैतिकता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. राजकारणात आता नैतिकतेचा लवलेशही उरलेला नाही; हे सर्व आता उघडपणे घडत आहे.”
Leave a Comment