उबाठाचे माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेत..
मुंबई, दि. ७ मार्च २०२६ ;
शिवसेना (उबाठा) गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, आमदार किशोर पाटील आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उन्मेष पाटील यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी,
बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांवर हा पक्ष पुढे जातोय त्यामुळेच सोलापूर मधील एका गरिब घरातील लाडक्या बहिणीला पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही आणि नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत. आपत्ती तिथं शिवसेना, संकट तिथं शिवसेना या उद्देशाने पक्ष काम करतो.
पहलगाम हल्ल्यावेळी महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षित आणले. आताही इराण आणि अमेरिका युद्धामुळे दुबई अडकलेल्या शेकडो भारतीयांना दोन विशेष विमानाने मायदेशी आणले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आज नारपार योजनेसाठी ७००० कोटींची तरतूद केली आहे. चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक गायगोठे देणारे, जत्रा शासकीय योजनांची राबवणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करणारे, गिरणा परिक्रमा करणारे उन्मेष पाटील आहेत.
खान्देशात शिवसेना घराघरात पोहोचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उन्मेष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना केले.
यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री दरे गावी शेतात रमतात तेव्हा राज्यातील शेतकऱ्याला विश्वास वाटतो की एक नेता शेतीमातीत रमतो आणि आपले दु:ख समजून घेतो. मी सरदार होण्यासाठी नाही तर सैनिक म्हणून काम करण्यासाठी आलोय, अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.









