‘त्या’ पोलिसांनी हिम्मतच कशी केली?
मुंबई, दि. 5 ऑक्टोबर
हाथरस बलात्कार व खून प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी उत्तर प्रदेशातील पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचा सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः महिला नेत्यांनी या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना चांगलंच झापलं आहे. शिवसेना नेत्या निलमताई गो-हे यांच्यानंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनीही पोलीसांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे.
चित्रा वाघ म्हणतात, ‘एका महिला नेत्याच्या कपड्यांना हात लावायची हिंमतच पोलिसांनी कशी केली? ही बाब केवळ राजकारणातील महिला नेत्यापुरती मर्यादित नाही. कुठलीही महिला असेल, पोलिसांनी अशा पद्धतीने आपली मर्यादा ओलांडता कामा नये.’
हा पक्षाच्या पलीकडचा विषय आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भारतीय संस्कृतीचा मान राखणारे आहेत. संस्कृतीचं रक्षण करणारे आहेत. त्यांनी या पोलिसांवर ताबडतोब कारवाई करायला हवी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.’
हाथरस प्रकरणावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी देशभरातून होत आहे. हीच मागणी करत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी हाथरसला निघाल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवलं व त्यांच्याशी गैरवर्तन केलं, त्यांच्या कपड्यांना हात घातला, त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
