उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा..
उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा..
मुंबई, दि. ७ फेब्रुवारी:
बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ST प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही.
“प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.
उशीर, बिघाड आणि रद्द फेऱ्यांवर नाराजी..
दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.
*वक्तशीर सेवा = वाढते उत्पन्न*
“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उत्पन्नवाढीसोबत खर्चावरही लगाम.
एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
“वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
