मुंबई पोलीसांचा तपास योग्यच !
मुंबई, दि. ४ ऑक्टोबर:
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येने मुंबई पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. सुशांतच्या आत्मत्येला हत्या असल्याचा आरोप करून मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका घेत अनेकांनी तोंडसुखही घेतले होते. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत घाईघाईने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले परंतु एम्सच्या अहवालात सुशांतचा आत्महत्याच केली आहे असा अहवाल दिला असल्याने मुंबई पोलिसांचा तपास योग्य व प्रामाणिकच होता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
एम्सच्या अहवालानंतर वृत्तसंस्थांना प्रतिक्रिया देताना मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग म्हणाले की, “मुंबई पोलिसांना तपासात ज्या बाबी आढळल्या होत्या त्याच इथेही आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा आणि कूपर रुग्णालयाचा तपास योग्य होता. या तपासावरुन आमच्यावर खूप आरोप झाले. मात्र, एम्सच्या अहवालाने हे सिद्ध केले की आम्ही खरे आहोत. सुशांतसिंहचे मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांनी व्यवस्थित हाताळले. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी प्रत्येक प्रकरण व्यवस्थित हाताळले आहेत. मुंबई पोलीसही अत्यंत प्रोफेशनल आहेत, आमचा आमच्या तपासावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. सीबीआय सुद्धा एक प्रोफेशनल तपास यंत्रणा आहे,”
परमबीर सिंग पुढे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे हा तपास सीबीआयकडे दिला होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीशी या निर्णयाचा संबंध नव्हता. मुंबई पोलिसांच्या तपासात न्यायालयाला कुठलीही त्रुटी आढळली नव्हती. मुंबई पोलिसांनी आपला चौकशी अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला होता. त्याबद्दल केवळ सहा जणांना माहिती होती. इतर कुणीही हा अहवाल पाहिला नव्हता किंवा अहवालात काय आहे याची कोणालाही अजिबात माहिती नव्हती. असे असतानाही काही लोकांनी विनाकारण मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका केली.’
एम्सचा हा अहवालाने मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब केलेच पण विनाकारण त्यांना बदनाम करणाऱ्यांचे तोंडे मात्र काळवंडली आहेत.
