शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही !
शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही !
नवी दिल्ली, दि. ३ डिसेंबर २५ ;
महाराष्ट्रात मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांना अजून मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जात नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून मदतीचा प्रस्ताव तातडीने मागवून घ्यावा कारण महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून त्याचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे त्याला मदतीची गरज आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाचा मुद्दा आज लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान उपस्थित केला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते. परंतु अद्याप असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. हे अतिशय धक्कादायक आहे. महाराष्ट्रात मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे सुमारे १४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी सरसकट कर्जमाफी बरोबरच अतिवृष्टीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण तसे होत नाही, हे दुर्दैवाचे असल्याचे नमूद केले.
यावेळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या हिंसक घटनांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या निवडणुकीत मारामाऱ्या, बंदुका दाखवणे अशा घटना झाल्या. असे प्रकार महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झाले नव्हते. महाराष्ट्रातील सरकार निवडणुकीत व्यस्त असून निवडणूक आयोगावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
