‘स्वाभिमानी’मुळे ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल जाहीर..
‘स्वाभिमानी’मुळे ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल जाहीर..
कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर;
कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या ३५०० रूपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला आहे. मात्र चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ५ कारखान्यांनी संघटित होवून ३४०० रूपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्याने ओलम कारखान्यावर गळीत हंगाम बंद ठेवून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. ओलम कारखाना व्यवस्थापनाने स्वाभिमानीच्या आंदोलनास शरण येवून पहिली उचल ३५०० रूपये जाहीर केली..
चालू वर्षी इको केन, दौलत, ओलम, आजरा साखर कारखाना व आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज या कारखान्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावास बळी पडून ३४०० रूपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १५ दिवसापासून तीनही तालुक्यात रान पेटवून ओलम कारखान्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दोन दिवसात हजारो शेतक-यांच्या दबावाने कारखान्याचा गळीत हंगाम बंद पडलेला होता.
तीनही तालुक्यातील कारखानदार व लोकप्रतिनिधींच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ओलम प्रशासन हतबल झाले होते. शेवटी स्वाभिमानीच्या रेट्यामुळे ओलम प्रशासनास ३५०० रूपये पहिली उचल देण्यास भाग पडले. सायंकाळी ६ वाजता कारखाना प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले.
