महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?
मुंबई, दि. 1 ऑक्टोबर:
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या पीडित मुलीचे अंत्यसंस्कार रात्रीच उरकले, त्यांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारही करू दिले नाहीत अशा परिस्थितीत काँग्रेस खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ न देता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपा सरकावर तोफ डागली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. ही घटना पाशवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचसोबत महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? असा जाबही राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांनाही विचारला आहे.
राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरला जाण्यापासून पोलिसांनी रोखले त्यावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवले जात आहे? नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे ? असे प्रश्न विचारले आहेत.
