images (24)

३७५१ रूपये टन पहिली उचल द्या नाहीतर…

बेळगांव, दि. ३ नोव्हेंबर २०२५;

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याबरोबर कर्नाटक सीमा भागातील ऊस उत्पादक शेतक-यांना ३७५१ रूपयाची पहिली उचल मिळवून देवू यासाठी आंदोलनाची तीव्रता अजून वाढविण्याची आर्त हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरलापूर जि. बेळगांव येथे झालेल्या ऊस  आंदोलनातील ऊस उत्पादक शेतक-यांना केली.

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रापेक्षाही कर्नाटक सीमाभागात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. यामुळे चालू वर्षी गळीत हंगामात पहिली उचल ३७५१ रूपये व गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला २०० रूपये दुसरा हप्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्धार कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आंदोलनादरम्यान केला आहे.

कोल्हापूर , सांगली व कर्नाटक सीमाभागातील साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटामारी व रिकव्हरी चोरी करत आहेत. सर्व कारखानदार एक होवून कोल्हापुर जिल्ह्यासाठी ३४०० रूपये व कर्नाटक राज्यातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील कारखाने ३ हजार रूपये पहिली उचल देण्यावर ठाम राहिले आहेत. मात्र ऊस उत्पादक शेतक-यांनी अभूतपुर्व एकी केली असून साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखून धरली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार कर्नाटकातील ८० ते ९० किलोमीटर अंतरावरून ऊस आणण्याचा प्रयत्न करत असून ९० किलोमीटर वरून येणा-या ऊसाला ३४०० रूपये दर देण्याची घोषणा जवाहर साखर कारखान्यांने केली आहे. यामुळे साखर कारखान्यास प्रतिटन जवळपास ११०० रूपये तोडणी वाहतूकीचा दर पडणार आहे. यामुळे स्वाभिमानीने प्रतिटन ३७५१ रूपयाची पहिली उचलची मागणी योग्य असल्याचे राजू शेट्टी म्हणाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *