योगी सरकारचे हे कृत्य अमानवी व न शोभणारे!
मुंबई दि. ३० सप्टेंबर:
घरातील लोकांच्या गैरहजेरीत भारताच्या पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे योगी सरकारचे अमानवी आणि न शोभणारे कृत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
हाथरस येथील पिडीत तरुणीचा अमानवी कृत्यानंतर मृत्यू झाला त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दु:ख व्यक्त केले होते परंतु त्या पीडित मुलीच्या प्रेतावर अंत्यसंस्कारही तिच्या नातेवाईकांसमोर करण्यात आले नाहीत याबद्दल मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे.
मुलींना जिवंतपणी सन्मान दिला जातोय ना मेल्यानंतरही, असे भावनिक ट्वीट करुन मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर प्रदेश सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
योगी आदित्यनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत असतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य निर्माण करु शकत नाही तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताच अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे.
