फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करू नका ..
फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करू नका ..
मुंबई, दि. २१ जुलै :
मुंबई महानगरपालिकेकडून मागील काही महिन्यापासून पथ विक्रेत्याविरुद्ध अनधिकृतपणे निष्कनाची कारवाई करण्यात येत आहे. सध्या पावसाळा सुरू असूनही कारवाई केली जात आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात असून कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबईचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
बोरिवली, कांदिवली फळे विक्रेता संघटनेचे पदाधिकारी आणि फेरीवाल्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त परिमंडळ ७ यांची भेट घेऊन चर्चा केली. फेरीवाल्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपआयुक परिमंडळ ७ चे उपआयुक्त संजय कुऱ्हाडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी किशन शेलार, इम्रान अन्सारी, परमहंस यादव, दरोगा यादव, प्रविण सानप, प्रितम फेकू गुप्ता, मनोहर देवाशी, मेनका सिंग आदी उपस्थित होते.
बोरीवली भाजी मार्केटमध्ये गत 60 वर्षापासून हे फुल विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. 2002 साली महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने फेरीवाल्यांचा सर्वे केला होता. या सर्वेचा उद्देश फेरीवाल्यांची संख्या निश्चित करून त्यांच्यासाठी जागा निश्चित करणे होता. Bmc ने सर्वे करून या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आखली होती त्यानुसार त्यांची संख्या व जागाही निश्चित केली होती. २०१४ सालीही असेच सर्वेक्षण झाला पण आजपर्यंत कायम स्वरूपी तोडगा निघाला नाही असे राजहंस म्हणाले.
