यंदा दीड लाख गोविंदांना विमा कवच..
यंदा दीड लाख गोविंदांना विमा कवच..
मुंबई, दि. २१ जुलै २५ ;-
दहीहंडी सण महिन्याभरावर येऊन ठेपला असून सर्व गोविंदा पथके जोरदार तयारीला लागली आहेत. राज्य सरकारने साहसी दर्जा दिल्यापासून या खेळात अनेक गोविंदांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा कवचाची गरजही वाढली आहे. सध्या ७५ हजार गोविंदांना विमा कवच मिळते. त्यात वाढ करून दीड लाख गोविंदांना शासनाने विमा कवच द्यावे, अशी मागणी भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली होती. दरेकरांच्या मागणीला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरेकर म्हणाले की, राज्यातील गोविंदा, गणेशोत्सव हे पारंपारिक सण आहेत. महाराष्ट्रातील गोविंदासाठी जे प्रलंबित प्रश्न होते ते सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस न्यायालयीन लढाई लढले. त्यामुळे गोविंदा उत्सव वाचला व तो उत्साहात साजरा केला जातोय. गोविंदांना साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र स्तरावर गोविंदा समन्वय समितीनेही मदत केलीय. दहिकाला उत्सवावेळी अनेक गोविंदा पडून जखमी होतात. अशा वेळी शासनाने त्यांचा विमा उतरवावा. सर्वकष अभ्यास करून श्रीकृष्ण पडेलकर व समितीने दीड लाख विमा कवच देण्याची शासनाकडे मागणी केली आहे. शासन दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याची व्यवस्था करणार का? अशी मागणी दरेकर यांनी केली.
आ. दरेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले की, गोविंदा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा परंपरागत असलेला उत्सव,खेळ आहे. १६ ऑगस्टला गोविंदा उत्सव आहे. गेल्या वर्षी सव्वा लाख गोविंदांना विमा कवच दिले होते. याही वर्षी राज्यभरातील दीड लाख गोविंदांना सुरक्षा कवच, विमा व प्रीमियम सरकार भरेल, पण या मातीतील खेळाला मदत करेल, अशी घोषणा केली.
