नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा..

0
20240314_085058

नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा..

मुंबई, दि. १९ जुलै ;
भारतीय जनता पक्ष युती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करत असतात. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशी विधाने करणे संविधान व लोकशाहीला न माननारा प्रकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानांवर खुलासा करावा व चिथावणीखोर विधानांची गंभीर दखल घेत त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

राजीव गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करणे हे एकच काम राज्यातील मंत्री नितेश राणे करत आहेत. आजही त्यांनी एका समाज घटकाला बदनाम करण्याचे काम केले आहे. मदरशामध्ये अतिरेकी तयार होतात म्हणून मदरशे बंद करा अशा प्रकारचे अकलेचे तारे नितेश राणे यांनी तोडलेले आहेत. नितेश राणे यांच्या जीभेला लगाम नाही, सातत्याने एका धर्माच्या विरोधात आग ओकण्याचे काम ते करत आहेत पण मुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नसतील तर नितेश राणेंच्या विधानांचे मुख्यमंत्री फडणवीसही समर्थन करत आहेत असेच म्हणावे लागेल. संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे मंत्रिपदावर बसलेत याची त्यांना जाणीव असायला हवी. समाजात शांतता भंग करण्याचे उद्योग त्यांनी करू नयेत, असेही खासदार वर्षा गायकवाड यंनी म्हटले आहे.

मराठी हिंदी वादामागे काहींचा राजकीय अजेंडा…
मराठी हिंदी वादावरून काही लोक राजकीय अजेंडा चालवत आहेत. कोणत्याही भाषेला काँग्रेसचा विरोध नाही. मराठीचा आपल्याला अभिमान आहे व मातृभाषेतूनच शालेय शिक्षण दिले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. सरकारने दोन जीआर काढले पण जनतेचा विरोध लक्षात घेऊन ते रद्द केले आता त्यानरून पुन्हा वाद निर्माण करण्याची गरज नाही. भाषावाद निर्माण करून मारामारी करणे योग्य नाही असेही खासदार गायकवाड म्हणाल्या.

संभाजी भिडे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ते आरएसएस भाजपाची भाषा बोलतात. भारताचे संविधान व तिरंगा झेंडा आरएसएसने कधीच मान्य केला नाही. स्वातंत्र्यानंतर ५० वर्ष आरएसएसने त्यांच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवला नाही. आजही ते संविधान मानत नाहीत. ते मनुवादी विचाराचे आहेत. जनतेच्या मुलभूत प्रश्नांना बगल देऊन अशा प्रकारचे वादग्रस्त मुद्दे जाणीवपूर्वक चर्चेत आणले जात आहेत, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *