महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया.
महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया.
पुणे, दि. ५ एप्रिल:
महाराष्ट्र स्टार्टअपची जननी आहे. स्टार्टअप्सची सर्वाधिक संख्या आणि सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. बंगळुरु किंवा हैदराबाद नाही तर महाराष्ट्र स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी COEP तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान, पुणे येथे ‘डिपेक्स 2025 : अ स्टेट लेवल एक्झिबिशन-कम-कॉम्पिटीशन ऑफ वर्किंग मॉडेल्स’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, टियर 2, 3 शहरांमधून आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंगमधील युवक स्टार्टअप उभे करत आहेत. यामध्येही टेक्नॉलॉजी स्टार्टअप अतिशय महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत 2047 ची संकल्पना मांडली, तेव्हा त्याच्या मुळाशी देशातली युवाशक्ती, इनोव्हेटर्स होते. युवाशक्ती भारताला विकासाकडे नेऊ शकते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्डचा नारा दिला. यातले सर्वात महत्त्वाचे क्षेत्र डिफेन्सचे असून एकेकाळी 100% आयात करणारा भारत आज ₹30-35 हजार कोटींची निर्यात करत आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी इथेनॉल धोरण, यामुळे पेट्रोल-डिझेलची कमी होत असलेली आयात, ऊर्जा सुरक्षितता, शेतीसाठी सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा, शून्य कार्बन उत्सर्जन हे विषयदेखील मांडले. तसेच ‘नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ’ असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती, या क्षेत्रातील नवे प्रयोग, नवे तंत्रज्ञान, स्टार्टअप, उद्योग व रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगितले. 2047 च्या विकसित भारताचा आपण विचार करतो तेव्हा विकासाचा अर्थ रस्ते, इमारती बांधणे नाही तर शाश्वत विकास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, डिपेक्समध्ये सहभागी झालेल्या इनोव्हेटर्सच्या कमर्शियल आणि स्केलेबल प्रकल्पाला हातभार लावण्याकरता महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पाठीशी उभे राहील, असे आश्वस्त केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री पंकज भोयर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव डॉ. विरेंद्र सोलंकी व इतर मान्यवर उपस्थित होते.
