S. P : मधुर आवाजाचा गायक गेला…
मुंबई, दि. 25 सप्टेंबर :
मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे.दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मातही केली होती.
सुब्रमण्यम यांनी विविध भाषांमधील 40 हजार गाणी गायली आहेत.हिंदीमध्ये त्यांनी मैने प्यार किया, साजनी, एक दुजे के लिये, रोजा सह असंख्य चित्रपटासाठी गाणी गायली. साऊथमध्ये त्यांनी जवळपास सर्वच हिरोंसाठी आवाज दिला आहे.
मान्यवरांची श्रद्धांजली…
लता मंगेशकर आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “प्रतिभावंत गायक, मधुरभाषी आणि एक उत्तम व्यक्ती एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार अस्वस्थ वाटत आहे. आम्ही दोघांनी एकत्र अनेक गाणी गायली, गाण्याचे अनेक शो केले.आज ते सगळं आठवतंय.त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे”, असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे.
सदाबहार आवाजाने भारतीय सिनेसृष्टी समृद्ध करणारे ‘पद्मभूषण’ एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन हा माझ्या सारख्या कोट्यवधी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. हिन्दीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायलेली चाळीस हजारांहून अधिक गाणी हा भारतीय संगीतातील मोठा ठेवा आहे. हा ठेवा संगीत रसिकांना मनमुराद आनंद तसेच त्यांची आठवण करुन देत राहील. भारतीय संगीत क्षेत्रातल्या या महान, दिग्गज कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसपी बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, एसपी बालसुब्रमण्यम साहेबांच्या आवाजात जादू होती. या जादूमुळे त्यांना कोट्यवधी चाहते मिळाले. त्यांचे चाहते बहुभाषिक आहेत. चित्रपट सुपरहिट ठरण्यात त्यांच्या गायनाची प्रमुख भूमिका असायची. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
