ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही.
ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही.
जळगाव, दि. २३ मार्च -:
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण कमी होत आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई संपलेली नाही. आम्ही शेवट पर्यंत लढू आणि ओबीसी घटकाचे आरक्षण कमी होऊ देणार नाही असे ठाम मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव आयोजित ओबीसी महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही केवळ एक समाजाची नसून ती समाजातील सर्वच घटकाची आहे. समता परिषदेमध्ये माळी, दलीत, तेली, चांभार, कुंभार, मुस्लिम सर्वच समाजाचे प्रतिनिधी यात आहेत.
अनेकांना वाटत असेल की मंत्रिपदासाठी हा मेळावा घेतला जातो आहे मात्र सामाजिक काम जो हाती घेतो त्याला त्रास सहन करावाच लागतो. ओबीसी समाज ५४ टक्के आहे मात्र तो फार मागास राहिला आहे. याच ओबीसींच्या मुद्द्यावर आपण महाराष्ट्रात प्रचंड मेळावे आपण घेतले आहेत. ५- ५ लाख समुदायाचे आपण या अगोदर मेळावे घेतले आहेत. दिल्लीत मेळावे घेतले आहे. रामलीला मैदानावर देखील आपण मेळावे घेतले. बीड मध्ये ज्यावेळी हॉटेल, घर जाळण्यात आली, घरांवर हल्ले झाले, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांचे घर जाळले. सगळ्याची राख रांगोळी केली होती त्यानंतर मी ठरवले आता शांत बसणार नाही त्यानंतर सर्वात अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबड ला पहिली सभा घेतली त्यामुळे मला मंत्रिपदाची चिंता नाही.
महाराष्ट्राला देशभरात पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रचला.महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ भिडेंच्या वाड्यात शाळामध्ये सुरु केली. ज्यावेळी महिलांना अस्पृश्या सारखी वागणूक देण्यात येत होती त्यावेळी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी शाळा चालवल्या. महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीत तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आदी सहकारी सहभागी होते.सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले.लहूजी वस्ताद साळवे आणि रानाबा महार हे त्यांच्या पाठीशी हिमतीने उभे राहिले.
आपल्या कार्यासाठी एक व्यापक संस्था असावी यासाठी महात्मा फुले यांनी २४ नोव्हेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली.जोतीराव ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते.एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता.
महाराष्ट्रात आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात बांठिया आयोगाने दिलेला रिपोर्ट प्रमाणे आरक्षण लागू होईल आमचा त्या रिपोर्टलाच विरोध आहे. त्यात ओबीसी घटकाची संख्या कमी दाखवण्यात आली आहे. ज्या गावचा सरपंच ओबीसी आहे त्या गावात एकही ओबीसी नाही असा रिपोर्ट बांठीया कमिशनने दिला आहे. त्यामुळे हा रिपोर्ट म्हणाला मान्य नाही. ओबीसीचे आरक्षण कमी होता कामा नये.
