बीडची अवस्था आजच्यासारखी कधीही नव्हती!
बीडची अवस्था आजच्यासारखी कधीही नव्हती!
बारामती दि.१५ मार्च;
बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. शांत व समन्वयाने सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीडला ओळखतो. बीड जिल्ह्याचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वत: जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे सहा-सहा सदस्य निवडून आले होते, तिथे एक प्रकारे सामंजस्याचं वातावरण होतं. पण दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे दुष्परिणाम आपल्याला काही महिन्यांत दिसून येत आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, माझे स्पष्ट मत आहे की, राज्य सरकारने यात कुणाचा हात आहे याचा विचार न करता जो कुणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करेल, त्यांच्याविरोधात अत्यंत सक्त धोरण आखण्याची गरज आहे. त्यातून बीडला पूर्वीचे वैभवाचे दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी. राज्यात सर्वत्र वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थितीत बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कठोर कारवाई करावी. कुणी सत्तेचा गैरवापर व लोकांमध्ये जात व धर्म यांच्यातील काही अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर सरकारने त्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, असेही शरद पवार यांनी सांगितले.
