पालकमंत्री पंढरपूरच्या नुकसानग्रस्त भागात!
पंढरपूर, दि. 24 सप्टेंबर :
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली.
पालकमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील 54 गावांतील मोठ्या प्रामाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 6500 ते 7000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त 517 कुटुबांचे स्थलातंर करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुराच्या पाण्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याने विद्युत पुरवठा पुर्वरत करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
अतिवृष्टिने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थित शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन आवश्यकती मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार भारत भालके यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टिमुळे विविध ठिकाणी नुकसान झालेल्या भागांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पालकमंत्री यांच्या बरोबर आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे ,दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे कासार उपस्थित होते.
