इतकी पापं करता कशाला जी धुवायला गंगेत जावं लागतं ?
इतकी पापं करता कशाला जी धुवायला गंगेत जावं लागतं ?
मुंबई, दि. १० मार्च;
इतकी पापं करता कशाला जी धुवायला गंगेत जावं लागतं. बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार ते पाणी..इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. असा हल्लाबोल करत राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून मनसैनिकांनी बाहेर यावं असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी ठिक होतं. माणसं, तिथं आलेल्या बायाबिया घासतात.. आताच करोना गेला. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले. तिकडे जाऊन आंघोळ करतात. कित्येक स्विमिंग पुल आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पितो. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. एक नदी या देशातील स्वच्छ नाही. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशातील नद्या स्वच्छ. ते काही माता म्हणत नाहीत. तरी नद्या स्वच्छ आहेत असे राज ठाकरे म्हणाले.
राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे असे राज ठाकरे म्हणाले.
