परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे लोकार्पण..

0
IMG-20250309-WA0122

परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे लोकार्पण..

परभणी,दि. १० मार्च :-

महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतक-यांचा आसूड, गुलामगिरी वाचल्यानंतरच त्यांनी केलेल्या कामाची महती कळेल,असे सांगून सर्वांनी महात्मा फुले यांची पुस्तके आवर्जून वाचावी आणि त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

परभणी जिल्हा परिषदेसमोरील चौकातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी यापूर्वीच परभणीला येऊन गेल्याचे सांगत, मंडल आयोगातील शिफारशींबाबत माहिती दिली. स्त्री -पुरुष समानता आणण्याचे फुले दाम्पत्याचे स्वप्न आज साकार होत आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्रियांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आज मुलींना मुलांच्या बरोबरीने उच्च शिक्षण देण्याबाबत आमदार भुजबळ यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत महोज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री म्हणून आम्ही राज्य शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवित असल्याचे सांगत नागपूरसह प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधत आहोत. मुलींना मोफत शिक्षण, १०० विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बसचा मोफत प्रवास अशा विविध योजनांची माहिती मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.

तसेच १ जानेवारी १८१८ रोजी फुले दाम्पत्याने भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. लवकरच येथे फुले दाम्पत्यांचे स्मारक उभारण्यात येणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमीपूजनही करण्यात आल्याचे मंत्री सावे म्हणाले.

साता-यातील नायगावात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने २०० मुलींना राष्ट्रीय‌ संरक्षण अकादमीमध्ये नियुक्तीसाठी प्रशिक्षण देणार आहोत, असे सांगून त्याबाबतच्या कामासाठी नुकताच १० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात आतापर्यंत ७२ पैकी ५४ वसतिगृह सुरू केले असून, प्रवेश न मिळालेल्यांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती सुरू केली असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *