हर्षवर्धन सपकाळांच्या रुपाने नव्या पर्वाला सुरुवात.
हर्षवर्धन सपकाळांच्या रुपाने नव्या पर्वाला सुरुवात.
मुंबई, दि. १८ फेब्रुवारी ;
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षात पक्षासाठी चांगले काम केले. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसने विधानसभेला ४२ जागी विजय मिळवला तर २०१९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ४४ जागी विजयी झालो, २०२४ च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव आणू, असे वडेट्टीवार म्हणाले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करू व पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम करू. हर्षवर्धन सपकाळ हे कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध असतात. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदा-या दिल्या त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करून मोठे यश मिळवून दिले. मध्य प्रदेशातही त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. सर्वोदयी तत्वज्ञान, गांधी विचाराने ते काम करतात. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. राज्यातील गावागावात शिबीरे घेऊन विचाराचे वादळ उठवू आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नव्याने काँग्रेस संघटन उभे करू.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले, पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. अफवांना बळी फडू नका, लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
