ठाकरेंचा ‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही’!
ठाकरेंचा ‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही’!
नाशिक, दि. १५ फेब्रुवारी;
शिवसेनेत लोक काम पाहून प्रवेश करत आहेत. माझी लाईन पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा, अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली. माझ्यासारखं काम करुन दाखवा तुम्हाला सॅल्यूट करेन, असे आव्हानही त्यांनी दिले. नाशिक येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते.
यावेळी नाशिकमधील उबाठा, मनसे, आरपीआय, राष्ट्रीय किसान बहुजन पक्ष, शिक्षक सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांनी मागील अडीच वर्ष फक्त शिव्याशाप देण्याचे काम केले पण तुमच्या आरोपांना आरोपांनी नाही तर कामातूनच उत्तर देणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावलं. शिव्याशाप दिले तरी चिंता करु नका, शिवसैनिक म्हणजे लाथ मारील तिथून पाणी काढू अशी ताकद आहे, म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेत, दिघे साहेबांच्या शिवसेनेत येत आहेत असे ते म्हणाले. जीवावर उदार होऊन पाठिशी उभे राहणारे शिवसैनिक हेच आपले ऐश्वर्य आहे आणि हीच आपली दौलत आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. घरी बसणाऱ्या लोकांना कायमचे घरी बसवण्याचे काम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारावर टीका केली. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. कपाउंडकरकडून औषध घेत असल्याने तुमची पोटदुखी बरी होत नाही. आपल्या सरकारने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु आहे त्यात औषध उपचार मोफत केले आहे. तिथल्या चांगल्या डॉक्टरला दाखवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम बरोबर असते. निवडणूक आयोग निपक्ष असतो. तुम्ही हरलात की ईव्हीएमवर, मतदार याद्यांवर आक्षेप घेणार, ही दुट्टप्पी भूमिका सोडा, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून आले. इतिहासात नोंद होईल, असे काम नाशिककरांनी केले. एक लाखाच्या मताधिक्याने जिंकणारे दादा हे केवळ नावातच नाही तर कामातसुद्धा दादाच आहेत. सुहास कांदेंनी या निवडणुकीत भल्याभल्यांचे वांदे करुन दाखवले. सुहास अण्णा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हीच आपली कमाई आणि ऐश्वर्य आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात जग बदलण्याची ताकदं आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी नाशिकर जनतेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. शिंदे यांना मानपत्र आणि गौरवचिन्हाने सन्मानित करण्यात आले. यासभेला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, मीनाताई कांबळी, ज्योती वाघमारे आणि नाशिकमधील मुख्य पदाधिकारी व्यासपीठावर उपलब्ध होते.
जेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण होऊ लागले. शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात गहाण टाकला ते आम्हाला बघवले आहे. ५० आमदारांसोबत आम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन उठाव केला. ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा, बाळासाहेब आणि दिघेंचे आशिर्वाद आणि तमाम शिवसैनिकांची शक्ती पाठीशी असल्याने आम्ही जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आणले. अडीच वर्षांपूर्वी राज्यात सगळं बंद होते ते सर्व प्रकल्प सुरु केले. अठरा तास काम केले एकही दिवस सुटी न घेता काम केले.
सर्वसामान्यांना सुखाचे दिवस आणण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. विरोधकांनी या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न केला, योजनेवर टिका केली मात्र लाडक्या बहिणींनी या सावत्र भावांना जोड़ा नाही दाखवला तर चांगलाच लगावला आणि त्यांना निवडणुकीत चारी मुंड्या चीत केलं, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ज्यांनी मला हलक्यात घेतले त्यांचे काय झाले हे निवडणुकीत दिसून आले. विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध केले.
