दिल्ली जिंकली आता मुंबई महानगरपालिका जिंकू !
दिल्ली जिंकली आता मुंबई महानगरपालिका जिंकू !
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी;
सामान्य, कष्टकरी दिल्लीकरांचा “मफलरने” गळा घोटणाऱ्या, फसवणाऱ्या आणि लुटेरे… संधीसाधू राजनीतीची साफसफाई करुन दिल्लीकरांनी “झाडूला” सत्तेबाहेर फेकले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी विचार धारेच्या बाजूने राजधानीने दणदणीत कौल दिला आहे अशी प्रतिक्रीया मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
दिल्ली विधानसभेत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर “मोठा भोपळा” देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवली आहे. ईव्हीएमला दोष देत आपले अपयश झाकण्याचा कार्यक्रम आता अजून जोरात करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक या सगळ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र जिंकलाच आज राजधानी दिल्ली पण जिंकली. आता आर्थिक राजधानीत ही मुंबईकर असाच बदल घडवणार. 25 वर्षे पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार असा इशारा शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला.
