मनोहर जोशी, अशोक सराफ, चित्तमपल्लींना पद्मपुरस्कार.
मनोहर जोशी, अशोक सराफ, चित्तमपल्लींना पद्मपुरस्कार.
दिल्ली, दि. २६ जानेवारी;
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ मारुती चित्तमपल्ली, व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव,गायिका अश्विनी भिडे देशपांडे, चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला देण्यात आला.
पद्म पुरस्कार विजेत्यांचे विशेष अभिनंदन करत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, वनं, पर्यावरण आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेल्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यातल्या प्रत्येक निसर्गप्रेमीचा गौरव आहे. जंगल वाचणारा माणूस ही ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनी इतरांनाही जंगल वाचायला शिकवलं. त्याबाबतची गोडी निर्माण केली. त्यातून वनांच्या संरक्षणाबाबतची जागृती वाढली, हे त्यांचं मोठं यश आहे, असं मी मानतो.
चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणे. जंगल, पशु, पक्षी यांच्या संरक्षण, संवर्धनाची सक्रीय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा, पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवापिढीला प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.
होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा, अर्ध्या शतकाहून अधिक काळ विदर्भातील गरीबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या समर्पित वृत्तीचा गौरव आहे. विदर्भातील वैद्यकीय सेवेतील भीष्मपितामह असा गौरव असलेल्या डॉ. विलास डांगरे यांनी ध्येयनिष्ठेने, समर्पित वृत्तीने पन्नास वर्षांहून अधिक गरीब रुग्णांची सेवा केली. याकाळात डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा समर्पित सेवाकार्याचा गौरव आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
