उद्धव ठाकरेंनीच राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही.

0
images (18)

उद्धव ठाकरेंनीच राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही.

मुंबई, दि. २६ जानेवारी ;

महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेका संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाईक असणारी लोकं आहोत. केवळ ठाकरे सेना नाही तर सगळ्या पक्षांत महाराष्ट्राची अस्मिता आहे. भावनिक राजकारण करून लोकांना भुलवण्याचे दिवस संपले, हे दुर्दैवाने संजय राऊत यांना समजून येत नाही. तशा प्रकारे भुलवता आले असते तर विधानसभेला जनाधार मिळाला असता, अशी टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना आ. दरेकर यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंबईत काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाबाबत बोलताना दरेकर म्हणाले कि, या प्रकरणी समाजाच्या भावना तीव्र आहेत. परंतु याबाबत राज्य सरकारने कठोर कारवाईची भुमिका घेतलीय. एसआयटी नेमून आरोपीना अटक केली आहे. याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितलेय. सरकार, गृहखाते म्हणून जे करायला हवे ते केलेले आहे. गुन्हेगारीच्या विषयाला कुणीही पाठीशी घालू शकत नाही. मुख्यमंत्री आताच दावोसहुन आलेत. याबाबत आढावा घेऊन आणखी सक्त आदेश देण्याची आवश्यकता असेल तर ते देतील.

जरांगे यांनी आजपासून सुरू केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना आ. दरेकर म्हणाले कि, मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात सरकारने भुमिका घेतलेली आहे. एससीबीसीचे आरक्षण दिलेले आहे. आता सरसकट प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी होती ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही. मराठा समाजाच्या हितासाठी जेजे करायचे आहे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच केलेय. सुदैवाने आजही ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मराठा समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आणखी जे काही करता येईल तीच त्यांची सकारात्मक भुमिका आहे. आरक्षणा संदर्भात दिलेले आरक्षण टिकविण्यासाठी सरकार शंभर टक्के कटीबद्ध आहे.

संजय राऊत यांच्या विधानावर आ. दरेकर म्हणाले कि, संजय राऊत यांनी नसते उपदव्याप कमी करावेत. त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबई, महाराष्ट्राच्या हिताच्या, विकासाच्या गोष्टी कधीच ऐकल्या नाहीत. खळबळजनक बोलायचे, विखारी टीका करायची, टोमणे मारायचे यापलीकडे संजय राऊत यांनी आतापर्यंत विकासाच्या संदर्भात काय केले याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगावे. केवळ त्यांच्या वलग्ना आहेत. त्यांची दखल घेणे योग्य वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *