मविआच्या १०० पराभूत उमेदवारांची न्यायालयात याचिका:
मविआच्या १०० पराभूत उमेदवारांची न्यायालयात याचिका:
मुंबई, दि. २६ जानेवारी;
राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते, निवडणूक आयोग जर निवडणुकीत पक्षपात करत असेल तर तो आपल्या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
