कृषी विधेयकावर राष्ट्रवादीची भूमिका…
मुंबई दि. २१ सप्टेंबर
मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हे विधेयक पास होण्यासाठी मोदींना मदत केल्याची चर्चा सूरू असताना, भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला नाही असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, सभागृह तून बाहेर जाणे म्हणजे पाठिंबा दिला असे होत नाही असे पाटील म्हणाले.
या विधेयकामुळे बाजार समित्यांचे अधिकार मर्यादित करण्याचे काम मुळे होणार आहे. जे शेतकरी बाजार समितीबाहेर मालाची विक्री करत आहेत त्यांना विक्रीतून लाभ झाला तर त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र बाजार समित्यांमधून जे संरक्षण मिळत आहे ते शेतकऱ्यांना मिळत राहणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शेतकऱ्यांनी आपला माल कुठेही विकावा असा कायदा केंद्र सरकार करते आणि दुसरीकडे कांदा निर्यात बंदी करते हा दुटप्पीपणा आहे. उत्तरेकडील राज्यात या विधेयकाला जोरदार विरोध होतं आहे. पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतक-यांचा कृषी विधेयकाला विरोध आहे. करार शेतीचा फटका बसू शकतो म्हणून तिथे विरोध होत आहे.
