महायुतीचे बहुमत मान्य पण मतांचे आकडे आश्चर्यकारक!

0
20220513_091734

महायुतीचे बहुमत मान्य पण मतांचे आकडे आश्चर्यकारक!

कोल्हापूर, दि. ७ डिसेंबर ;

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत मात्र उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांची 58 लाख मतं आहेत त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून आले. आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत असे शरद पवार म्हणाले.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. तसेच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत असताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. मी उगीचच आरोप करणार नाही कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. आम्ही फक्त मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला एकंदर किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले.

पुढे शरद पवार म्हणाले, चार निवडणुका आत्ता झाल्या आहेत. हरियाणामध्ये मी स्वत: गेलो होतो. तिथं भाजपची अवस्था अतिशय कठिण होती पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मीर मध्ये निवडणूक झाली. तिथे फारुक अब्दुल्ला यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. इथं भाजपला यश आलं. मात्र, झारखंडला त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की, एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात, एका निवडणुकीत आम्ही जिंकलो. ईव्हिएमचा काही संबंध नाही. मोठी राज्य आहेत, तिथे भाजप आहे आणि छोटी राज्यं आहेत, तिथं अनेक पक्ष आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असेही शरद पवार यांनी सांगितलं.

निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की त्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे जायचं असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *