राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी..

0
20241109_180924

राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी..

 

गुरुकुंज मोझरी, दि. ९ नोव्हेंबर ;

जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे आणि ग्रामगीतेतून देशात एकता निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या विषारी घोषणा देणाऱ्या योगींच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही.योगी म्हणजे मुखात राम आणि बगल मध्ये सुरी अशी लक्षणे तर ढोंगी साधूंची असल्याचा पलटवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

 

गुरुदेवनगर गुरुकुंज मोझरी येथे शनिवारी यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना खरगे म्हणाले की, राष्ट्र एकसंघ राहण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे मोठे बलिदान आहे. आरएसएस, भाजपने स्वातंत्र्यासाठी काय केले, भारताचा इतिहास लक्षात घेता काँग्रेसचे योगदान आणि बलिदान दिसून येते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आम्ही संविधानावर चालणारे लोक आहोत मात्र विरोधकांची भाषा संविधान तोडणारी, मनुस्मृतीची भाषा आहे.

 

जुमलेबाज मोदी सरकारने ना पंधरा लाख दिले नाही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या दिल्या,ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. याउलट शेतीमालाचे भाव कमी झाले, बेरोजगारी वाढली, देशात अराजकता निर्माण केली.काँग्रेसने संविधान वाचवून लोकशाही जिवंत ठेवल्यामुळे आज मोदी प्रधानमंत्री झाले असे सांगून खरगे यांनी आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे नमूद केले. संविधान असेल तर देशातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत त्यामुळे तोडण्याची भाषा करणाऱ्या व मनुस्मृतीवर चालणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *