सत्ता द्या महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवतो!
सत्ता द्या महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवतो!
मुंबई, दि. ९ नोव्हेंबर ;
कोकणाचा निसर्ग भुरळ घालतो पण कोकणात सुविधा नाहीत. कोकणातील लोकं शिक्षण, नोकरी धंद्यासाठी कोकणसोडून बाहेर जातात हे दुर्दैव आहे. ७५० किलो मीटरची किनारपट्टी लाभलेला कोकण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे पण इथे वीजप्रकल्प, रिफायनरी नको तर पर्यटन प्रकल्प राबवले पाहिजेत. केरळ, गोवा राज्य फक्त पर्यटनावर उत्तम चाललात, कोकणात पर्यटन विकास केला तर अख्खा महाराष्ट्र पोसला जाऊ शकतो. हे करण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता मनसेच्या हातात द्या महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवतो, असे राज ठाकरे म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर तुफान हल्ला केला, आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाली की, तुम्ही ज्या लोकांना निवडून देता त्यांच्याकडे कल्पना शक्ती व राजकीय इच्छाशक्ती नाही. वर्षानुवर्षे या लोकांनी रोजगाराची स्वप्ने दाखवली पण रोजगार दिले नाहीत. कोकणात पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की कोकणातील लोकांना गाव सोडून दुसरीकडे जायची वेळच येणार नाही. कोकणाचा कॅलिफोर्निया करू अशी आश्वासने राजकारण्यांनी आश्वासने दिली पण त्यासाठी काय प्रयत्न केले? काहीही नाही..
नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना विकास कामे केली नाशिकमधील रस्त्यांची कंत्राटे देताना कोणालाही काहीही द्यायचे नाही फक्त रस्त्यात खड्डा दिसला तर रस्त्यात उभा करून मारेन असे बजावले होते. आज मुंबई-गोवा रस्त्याचे काम अजूनही झालेले नाही. एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा मग बघा कोकण कसा गोवा, केरळ पेक्षा मोठा श्रीमंत होईल. नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनी हडप केल्या मग नाणारला विरोध झाल्यानंतर बारसूला प्रकल्प करण्याचे ठरले मग तिथे जमीन अधिग्रहण झाले. या जमिनी आल्या कुठून? तुमच्याच जमिनी मामुली किंमतीत तुमच्याकडून घ्यायची आणि वाट्टेल तशा किंमतीत सरकारकडून पैसे घेतले. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचे अस्तित्व संपले. जगात युद्ध झाली ती जमिनीच्या मालकीसाठी हे विसरू नका. तुम्ही ज्यांना निवडून दिले त्याच पक्षाचे लोक तुमच्या जमिनीचे सौदे करत आहेत. राज ठाकरे सांगतोय की मी तुमच्या जमिनीवर विकास घडवून दाखवतो.म्हणून आजपर्यंत तुम्हाला लुबाडणाऱ्या, फसवणाऱ्यांना मतदान केले आता मनसेच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
