IMG-20240725-WA0117

मुंबई, दि. ११ सप्टेंबर –

काँग्रेस सत्तेत आल्यास पुढच्या काळात आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा आता उघड झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. गांधींच्या या विधानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतात. त्यांच्याकडून देशप्रेमाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभेत संविधान बदलणार असे खोटे नेटेटिव्ह पसरवून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली, आता याच काँग्रेसच्या नेत्याने आरक्षण रद्द करण्याची भाषा केली असून यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राहुल गांधी यांची आरक्षण विरोधी भूमिका म्हणजे पोटातलं ओठावर आलं असेही ते म्हणाले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमाने जनतेला आरक्षण मिळत आहे. पण याच काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा अवमान केला. त्यांना निवडणुकांमध्ये पराभूत केले होते. त्यामुळेच बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळके घर असल्याचे म्हटले होते. बाबासाहेबांच्या या वक्तव्यांचीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आठवण करून दिली.

परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करायचं हे गांधी यांचे कोणते देशप्रेम आहे? असा सवालही त्यांनी काँग्रेसला केला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा नाव लौकिक वाढत आहे. त्यांच्या नेतृत्वात ११ क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर घोडदौड करत आहे. एकीकडे देश प्रगतीपथावर असताना परदेशात जाऊन भारतीयांचा अपमान करण्याचा अधिकार गांधी यांना कुणी दिला असा परखड सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *