जबाबदारी झटकू नका, शिवप्रेमींची माफी मागा.
मालवण, दि. २८ ऑगस्ट :-
महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळी भेट दिली तत्पूर्वी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे. मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसं असतं तर दोन-तीन झाड पडली असती पण तसं न होता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याच काम सदोष होतं. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचे काम दिले. दीड – दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला ३५ फुटाच्या पुतळ्याचे काम दिले. सरकार म्हणतंय पुतळा नेव्हीने बांधला आहे. सरकारला हात झटकून चालणार नाही, यात सरकार जबाबदारी ही सरकारची आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. हा शिल्पकार आपटे कोणी शोधला? कोणी नेव्हीला त्याची माहिती दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा कसा दाखल केला? गुन्हा दाखल करणे म्हणजे आपण काही तरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप सरकार करत आहे अशी टीका असताना सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सरकार काम फक्त टेंडर काढणे, जवळच्या लोकांना कंत्राट देणे, त्या कामाचा इव्हेंट करणे त्यापलीकडे सरकार काहीच करायला तयार नाही असा आरोप त्यांनी केला तसेच सरकारने राज्यभरातील शिवप्रेमींची माफी मागावी असेही ते म्हणाले.
या प्रकरणाची जर सरकारला खरंच चौकशी करायची असेल तर दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी बसून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची निवड करावी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
