PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा कधी ?
मुंबई दि. १६ सप्टेंबर:
पीएमसी बँकेच्या ९ लाख खातेधारकांना त्यांच्या ठेवी कधीपर्यंत मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे एक निश्चित कालमर्यादा केंद्रसरकारने जाहीर करुन खातेदार व गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेच्या सभागृहात केली.
लोकसभेत बँकींग नियमन (सुधारणा) विधेयक २०२० बाबत झालेल्या चर्चेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सहभाग घेतला. तीन महिन्यात केंद्रसरकारने पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काय केले अशी विचारणाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. गेल्या जुन महिन्यात सरकारने याबाबत वटहुकूम काढण्याची घोषणा केली होती.परंतु याबाबत पुढे काहीच झाले नाही याबाबत नाराजीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली.
बँकींग नियमन (सुधारणा) विधेयक २०२० अंतर्गत केंद्र सरकार पीएमसी बँकेला ६,५०० कोटी रुपयांचे भांडवल कधी देणार असा प्रश्नही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विचारला. यासोबतच खातेदार व गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकेची मालमत्ता विकण्याची तयारी चालविली आहे.याबाबत सरकारची भूमिका काय आहे असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारला विचारला.
याशिवाय साधारणतः वर्षभरापुर्वी आलेल्या विलिनीकरणाच्या प्रस्तावाला मंजूरी का मिळाली नाही याबाबतही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारकडे विचारणा केली.
