अशी असणार ‘माझे कुटुंब……’ मोहिम !
मुंबई, दि.15 सप्टेंबर:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोनाविरुध्दच्या लढाईतील महत्वाकांक्षी मोहिम, माझे कुटुंब,माझी जबाबदारी.. चा शुभारंभ करण्यात आला. काय आहे ही मोहीम पहा…
कोरोना विषाणुला रोखण्यासाठी मोहीम.
आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम.
यात पहिल्या टप्प्यात आजपासून १० ऑक्टोबरपर्यंत घरोघर आरोग्य सर्वेक्षण केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार.
पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा तर दुसरा १२ दिवसांचा असेल.
यात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, त्यांना इतर कोणते आजार आहेत का? हाय रिस्क गटातील,वयस्क, यांना असलेले आजार, हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील.
या व अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येणार आहे.
ही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाऊन गावे, वाडी, पाडे येथील प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येईल.
महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करतील.
दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहे.
ही लोकांची मोहीम राहणार आहे. यात सरपंच, नगरसेवक यांच्यावरही जबाबदारी असेल.
मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत चालविली जाईल.
आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.
जिल्हा स्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागात पहिल्या तीन संस्था निवडण्यात येऊन त्यांना गुणांच्या आधारे बक्षीस दिले जाईल.
विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांना देखील बक्षीसे देण्यात येतील.
