शहरे, गावखेड्यांत, वाडीवस्त्यांवर क्रीडासंस्कृती रुजवा.

0
IMG-20230824-WA0064

मुंबई, दि. २३ जून :-

देशाला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातली शहरं, गावखेडी, वाडीवस्त्यांवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुणवंत खेळाडूंना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात येत आहे. खेळ आणि खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न केले जात आहे. ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू निर्माण होण्यासाठी राज्यात पोषक वातावरण आहे. राज्यातील खेळाडू, क्रीडा संघटना आणि राज्य शासनाच्या सामुहिक प्रयत्नातून आगामी ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्र देशाला सर्वाधिक पदके जिंकून देईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, खेळ हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त बनवतात. खेळांमुळे खिलाडू वृत्तीने वागण्याची शिकवण मिळते. सुसंस्कृत, समंजस, सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्याने महाराष्ट्रात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्य शासनाबरोबरच क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते करत असतात. जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील या सर्व खेळाडूंचे, क्रीडा संघटनांचे, क्रीडा कार्यकर्त्यांचे आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे मी आभार मानतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी, राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाबरोबरच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने विविध योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि खेळाच्या संघटनांना महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने राज्य क्रीडा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील क्रीडा गुणवत्ता अधिक प्रगल्भ होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षित प्रशिक्षक तयार करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री तथा संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकूल येथील ऑलिम्पिक भवन व ऑलिम्पिक म्यूझियम इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. याठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक म्युझियम विकसित होत आहे. ऑलिम्पिक भवनच्या ७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्यालये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय, क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहे. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळेल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

 

वर्ष २०२८ मध्ये लॉस ऐंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, योगा यासारख्या महाराष्ट्रातील, तसेच भारतातील स्थानिक खेळांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने ऑलिम्पिक समितीकडे पाठपुरावा सुरु आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू देशासाठी मोठ्या प्रमाणात पदके जिंकतील, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *