महाराष्ट्राच्या बदनामीचा पयत्न…उत्तर देईन!
मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला.कोरोना, अनलॉक, शेतकरी, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर बोलत राज्य सरकारने केलेल्या सर्व उपाय योजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर व सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री घरात बसून काम करतात, घराबाहेर पडत नाहीत, असा विरोधक माझ्यावर आरोप करत आहेत पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे आणि काम होत आहे. आरोप करून काहीही फायदा नाही. आरोप करणारे जिथे गेले नाहीत अशा दुर्गम भागात मी जाऊन आलो आहे. तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सूचनाही केल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या गोष्टी मी पार पाडल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, ‘सारे काही खुले करत आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून नक्की बोलेन पण आज माझ्या दृष्टीने करोना महत्वाचा आहे’.
