Ads

--

बारामतीच्या निवडणुकीची अमेरिकेलाही चिंता..

By Xtralarge News

May 6, 2024 11:22 am

Ads

बारामती दि. ६ मे :

ही निवडणूक देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपच्या हातात देशाची सत्ता आहे. संपूर्ण देशाचे राज्य दिल्यानंतर देखील ज्याप्रकारे ते निर्णय घेतात यावर देश नाराज असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना म्हटले आहे.

बारामती येथे शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषणराजे होळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीची शेवटची सभा आपण दुसरीकडे घेत असतो. मात्र, आज सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी ती जागा घेतली. त्यामुळे आपण या ठिकाणी सभा घेत आहोत. ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. मध्यंतरी कन्हेरीच्या सभेत एका कोपऱ्यात एक अनओळखी माणूस उभा होता. माझ्या लक्षात आले की ते पत्रकार असावेत. त्यांना मी बोलावून घेतले आणि विचारले तर ते म्हणाले मी अमेरिकेतून आलो आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आज बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता आहे. एवढे महत्व तुमच्या लोकांच्या निर्णयावर असणार आहे असे शरद पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे भाषण झाले. ते मीदेखील ऐकले. या तीनही भाषणामध्ये अनेक चांगले मुद्दे मांडले. तीनही उमेदवारांनी चांगली मुद्दे मांडली. आता जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. प्रश्न खूप आहेत. महागाई, शेती, रोजगारासह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनतेचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल असेही शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

गेले काही दिवस मी महाराष्ट्रमध्ये फिरत आहे. माझा घसा बसला आहे. त्यामुळे सांभाळून घ्या उन्हाळा आहे, सतत भाषणे याचा परिणाम घशावर झाला. त्याठिकाणी जाऊन भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की, लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे, असेही शरद पवार म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment