नरेंद्र मोदींनी पदाची प्रतिष्ठा घालवली.
चोपडा, दि. ३ मे :
मला सत्ता द्या पन्नास दिवसात महागाई कमी करतो असे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. मात्र दहा वर्षात महागाई कमी नाही झाली तर वाढली आहे. मोदींनी आपला शब्द पाळला नाही. गॅस सिलेंडर कमी करणार असल्याचे सांगितलं मात्र आज ११६० रुपये भाव आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
चोपडा येथे महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले की, दोन कोटी रोजगार देणार असल्याचे सांगत होते. आज काय परिस्थिती आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. दोन कोटीची केवळ घोषणा होती. मोदी केवळ घोषणाच करतात. सत्ता देशाच्या हितासाठी असायला पाहिजे. केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीका केली तर त्यांना जेलमध्ये टाकले. सत्ता यासाठी वापरायची असते का? राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने या देशासाठी त्याग केला आहे, सेवा केली आहे. इंदिरा गांधी यांनीही देशासाठी काम केलं, योगदान दिले. त्याचा अभिमान असायला पाहिजे मात्र हे त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी आमच्यावरही टीका करत आहेत. मोदी केवळ टीका टिप्पणी करून आपल्या पदाची गरिमा कमी करत आहेत.
जळगाव जिल्हा राज्यात महत्वाचा जिल्हा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारा हा जिल्हा आहे. महात्मा गांधी यांनी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चळवळ उभी केली होती. पहिले काँग्रेसचे अधिवेशन फैजपूरमध्ये झाले होते. देशासाठी काम करताना कोणती तमा बाळगली नाही, असे नेते या ठिकाणी होते. महाराष्ट्राची विधानसभा किती उत्तमरित्या चालविता येते हे अरुण गुजराती यांनी दाखवून दिले होते.
जनतेची सेवा कशी केली पाहिजे या जिल्ह्यातून विविध क्षेत्रात पाहायला मिळाले आहे. विधायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे. निवडणुका येतात जातात पण जनतेच्या समस्या काय त्या कशा सोडवायला हव्या ते पाहायला पाहिजे. आज काय चित्र दिसत आहे? लोकांनी श्रीराम पाटील यांच्यासारखा काम करण्याची इच्छा असणार नवखा उमेदवाराला साथ द्यायला पाहिजे. आज देशात अनेक प्रश्न आहेत. त्याची चिंता लोकांना आहे. दहा वर्षात मोदी यांच्या हातात सत्ता आहे. मत मांडायचा त्यांना अधिकार आहे. पण ते सत्यावर आधारित असले पाहिजे पण तसे किती दिसत आहे याचा विचार केला पाहिजे.
दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र मोदी यांना त्यांचे प्रश्न काय आहे? हे समजून घ्यावे, असे वाटले नाही. म्हणून आज शेतीची ही अवस्था झाली आहे असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सागितले.
