… तर संविधान व आरक्षणही संपणार!
लातूर, दि. १ मे :
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला. भाजपाने जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप केले. लोकसभेची ही निवडणुक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची केंद्रात सत्ता आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.
भाजपा सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले की, भाजपने मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी आरक्षण दिले नाहीच उलट राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला. भारतीय जनता पक्ष व आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आली तर ते संविधान बदलणार व संविधानाने दिलेले आरक्षणही संपवणार. भाजपने २०१४ साली खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली, २०१९ मध्ये पुलवामा येथे हल्ल्यात ४० जवान शहिद झाले, हा हल्ला कोणी त्याचा तपास आजही लागलेला नाही. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली व अदानी, अंबानीचे घर भरले. कांदा निर्यात बंदी उठवताना गुजरातची उठवली पण महाराष्ट्रातील कांदा निर्यातला परवानगी दिली नाही. भाजपा सरकारने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले. राम मंदिर उद्घाटन व संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी असल्याने भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान केला, असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसने जनतेला गॅरंटीकार्ड दिले आहे, गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, एमएसपीचा कायदा आणणार, शेती जीएसटी मुक्त करणार, जातनिहाय जनगणना करणार आहे असे नाना पटोले यांनी सांगितले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल भाष्य करण्यात आले नाही. २०१४ च्या निवडणुकीत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून मेट्रोचे कोच तयार करू असे भाजपवाले म्हणाले होते, 2019 ला त्याच फॅक्टरीतून बुलेट ट्रेन कोच तयार करू असे म्हणाले आणि आता 2024 ला ते त्या फॅक्टरीतून वंदे भारत कोच तयार करू असे म्हणतात पण महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार म्हणून या फॅक्टरीतून कोच बाहेर काढतील. नांदेड अहमदपूर रेल्वे विकसित झाली पाहिजे, रोकडा सावरगाव पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता करू, या परिसरातील ऊस मांजरा परिवार घेऊन जाईल. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करा आणि ७ मे रोजी डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन देशमुख यांनी केले.
