आदित्य ठाकरेंच्या तोंडी काँग्रेसची भाषा..
परभणी, दि. २३ एप्रिल:
एक सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने आदित्य ठाकरेंना प्रचंड पोटदुखी झाली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत, शिव्या देत आहेत पण ही शिवीगाळ मलाच नव्हे तर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मराठा आणि बहुजनांनाही आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले मात्र त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत. सत्ता गेल्यापासून ते वेडेपिसे झाले आहेत. ते मणिशंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा बोलू लागले आहेत. असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिले.
परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने मौलाना आझाद महामंडळाचा निधी ३० कोटींवरुन ५०० कोटींपर्यंत वाढवला आहे. सरकारने सर्वच समाज्याला न्याय देण्याचे काम केले. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ते मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, असे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरले आणि त्यांना गरिबीत ठेवले.
बाळासाहेबांच्यावेळी साबीर शेख मंत्री होते आताच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत. सगळे एकत्र येऊन राज्याचा विकास करत आहेत. त्यामुळे संविधान बदलण्याचे विरोधकांचे आरोप खोटे आहेत. मागील ५० वर्षात जेवढे काँग्रेसने काम केले नाही तेवढे काम १० वर्षात केंद्र सरकारने केले आहे. पुढील १०० वर्षे ते हे काम करू शकणार नाहीत. बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर दिल्लीत जाणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
