11 वी प्रवेशांना स्थगिती देण्याची घाई काय होती?
मुंबई, दि. 10 सप्टेंबर:
एसईबीसी अंतर्गत मराठा समाजातील मुलांना 11 वीच्या प्रवेशात जी संधी उपलब्ध होती त्याला राज्य शासनाने तातडीने स्थगिती का दिली? ज्या तत्परतेने हा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यावरून मनात शंका निर्माण होतात. मराठा समाजाचे एमएमआर मध्ये सुमारे 18 हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत होते. आज दुपारपर्यंत लेखी आदेश आलेले नसताना सरकारने तत्परतेने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची घाई का केली, असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला.
एका बाजूला पुन्हा फेरविचार व्हावा म्हणून न्यायालयात जाणार असे सरकार सांगते आहे तर दुसरीकडे लेखी ऑर्डर यायच्या आत प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देऊन मोकळे होते याचा अर्थ असे आदेश येणार हे राज्य सरकारला माहिती होते का? हे फसवाफसवीचे काम तर नाही ना? असे समाजाच्या मनात येत असून राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.
