फसवणूक नको आरक्षण द्या’ !
फसवणूक नको आरक्षण द्या’ !
मुंबई, दि. २६ फेब्रुवारी:
राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’ ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा – ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.
विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, जितेश अंतापुरकर ,भाई जगताप, राजेश राठोड शिवसेना गटनेते अजय चौधरी,राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, सुनील भुसारा , विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
