सगळं दिलं पण ५ टक्केही निष्ठा पाळली नाही.
पुणे, दि.२२ फेब्रुवारी:
दिलीप वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केले. आंबेगाव तालुक्याने वळसे पाटील सारखे नेते दिले, त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं दिलं, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली. एवढं दिल्यानंतरही वळसे पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती त्यातील पाच टक्के निष्ठा सुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही असे हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगाव विधान सभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केला.
शरद पवार म्हणाले की, जर हे लोक आम्हा लोकांबरोबर निष्ठा ठेवत नसतील तर उद्या निवडून दिल्यानंतर जनतेशीही निष्ठा ठेवणार नाहीत, एवढंच मला सांगायचे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर तुम्हा सर्वांना जागं राहावं लागेल. पुढील दोन महिने आम्ही पिंजून काढू. निष्ठवंतांना निवडून आणू, तुम्हीही निष्ठवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो, असेही आवाहन शरद पवार यांनी केले.
पुढे शरद पवार म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा खासदार इथल्या जनतेने निवडून दिला. लोकसभेत ते बोलायला लागल्यानंतर इतर खासदार अतिशय शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. कोल्हेंसारख्या निष्ठावान लोकांची आज गरज आहे. सामान्य माणसाला जागं करून जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांची निवड करा.
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मी उभा केला. यांना निवडून आणलं. हे उमेदवार माझ्या नावाचा फोटो घेऊन निवडणून आले आणि आता सोडून गेले. पूर्वी माझ्यासोबत काम करणारे आज नाहीत पण त्यांच्यात निष्ठा होती. काय कमी केलं विधानसभा, मंत्री अनेक पद दिली, ऐवढं सर्व दिलं, तरी पाच टक्के तरी निष्ठा ठेवायला हवी होती. यापुढे नागरिक तुमच्या बाबत निष्ठा ठेवणार नाहीत असेही पवार म्हणाले.
आज देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे तुम्ही आहात. मात्र आज देशात कुठे गेलं तरी काळ्या आईशी इमान राखणारे संकटात असलेले दिसतात. घाम गाळून कष्ट करून मेबादला मिळत नाही. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे सन्मानाने जगण्याची इच्छा शेतकऱ्याची आहे. १० वर्षापूर्वी शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती. पहिल्या फाईलमध्ये देशात गहू तांदुळसाठा नव्हता. त्यावेळी झोप आली नाही. देशाची शेतीप्रधान ओळख असताना धान्य परदेशातून आणायचं ही परिस्थिती समोर होती. ती यशस्वीपणे सांभाळली आहे. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आस्था नाही. भाजपला ज्या ज्या विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला, त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली. आता तुरुंगात टाकलं जात आहे. आजच्या राज्यकर्त्यांना मनासारखी भूमिका घेणाऱ्या लोकांची गरज आहे. विरोधात गेले की तुरुगांत टाकतात. अशोक चव्हाण यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्री केलं ते विसरून ते भाजपात गेले. तुरुंगात जाण्यापेक्षा सोबत गेले. आजचा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, अशी अवस्था राजकारणाची झाली आहे असे शरद पवार म्हणाले.
बऱ्याच दिवसांनी जाहीर सभेच्या निमित्ताने आज मी तुमच्या समोर आलो आहे. आज वेगळा काळ आहे, देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे आज तुम्ही सगळे समोर आहात. देशात कुठं ही गेलो तरी पाहतो, काळ्या मातीशी इमाने इमानदार असणारा शेतकरी संकटात आहे. तो घाम गाळतो, पण पिकाला रास्त भाव मिळेना. असं घडलं की शेतकरी कर्जबाजारी होतो. अशावेळी सावकार आणि बँका घरातील वस्तूही नेतात. सन्मानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट आहे. असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जाहिरात आहे. मोदींची गॅरंटी, कोणाची गॅरंटी तर मोदींची, काय गॅरंटी तर शेतीला भाव, तुमच्या मुलाला नोकरी, वगैरे वगैरे अशी गॅरंटी देतात. एकीकडे ही गॅरंटी अन दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. असेही शरद पवार म्हणाले.
