पक्ष फोडणाऱ्यास पात्र करणे लोकशाहीसाठी घातक..

0
20221212_102213

पक्ष फोडणाऱ्यास पात्र करणे लोकशाहीसाठी घातक..

मुंबई, दि. १० जानेवारी ;

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेला आजचा निकाल हा स्क्रिप्टेड होता. मुद्दाम वेळ वाढवून उशिराने निकाल दिला गेला. एकास पात्र आणि दुसऱ्यास अपात्र ठरवलं असत तर जनतेचा उद्रेक झाला असता म्हणून दोन्ही गटास पात्र करण्यात आले आहे. मात्र हा अंतिम निकाल नाही. राज्यातील जनता योग्यवेळी त्यांना आपली जागा दाखवेल, असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय दिल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड अवैध ठरवली असताना विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी ती वैध ठरवली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अवमान करत कायद्याप्रमाणे निकाल दिला नाही. या निकालात पक्षांतर बंदी कायद्याची खिल्ली उडविण्यात आली आहे. देशातील लोकशाही संपविण्यासाठी हा घातक निर्णय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

सहानुभूती मिळू नये म्हणून दोघांनाही पात्र केले आहे. देशाची घटना शिल्लक राहिली पाहिजे. शिंदे गटाला पात्र ठरवले आहे आणि उद्धव ठाकरे गटाला अपात्र ठरविले असते तर सहानुभूती मिळाली असती, असे म्हणत  पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर चाललेली मस्ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. ठाकरे आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे. हा निकाल मराठीत वाचणे अपेक्षित होते. मात्र तो इंग्रजीत वाचण्यात आला, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *