देशात सध्या गाय, गोमूत्र आणि गोळवलकर ! 

0
20240104_205634

देशात सध्या गाय, गोमूत्र आणि गोळवलकर !

शिर्डी, दि. ४ जानेवारी:

देशातील चित्र वेगळ आहे, भाजपच्या हातात सत्ता असून जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती तशीच आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. सरकारची भूमिका समाजातील लहान घटकांना मदत न करण्याची आहे त्यामुळे देशात सध्या फक्त गाय, गोमूत्र आणि गोळवलकर एवढंच दिसत असून आरएसएसची विचारधारा रुजवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात समारोपाच्या भाषणात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे ‘ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली होता. या शिबिराचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समारोपीय भाषणाने झाला.

शरद पवार म्हणाले की, सातत्यानं सांगितलं जातं ४०० पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आपण पहिलं तर त्या ठिकाणी भाजप नाही. काही राज्ये अशी आहेत जिथं भाजप आहे. मात्र ते स्वत:च्या बळावर नाही. गोव्यात काँग्रेसचे सरकार होते तिथे आमदार फोडण्यात आले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. सध्या देशातलं चित्र भाजपाला अनुकूल नाही. केरळमध्ये आज कम्युनिस्ट व काँग्रेसचं राज्य आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये भाजपा नाही. तीन राज्यांच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशमध्ये आमदार फोडून तिथे भाजपानं सत्ता मिळवली. भाजपाने लोकांची फसवणूक करण्याचं काम केलं आहे.

मोदी संसदेत क्वचितच येतात पण जेव्हा येतात तेव्हा एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की संसदेतले सदस्यही काही वेळासाठी थक्क होतात. घोषणा खूप करतात. २०१६-१७ या काळातला अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला. त्यात सांगितलं की २०२२ पर्यंत देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. आता २०२४ आलंय पण काहीच घडलं नाही. एकदा मोदींनी संसदेत सांगितलं की २०२२ पर्यंत शहरी भागातल्या लोकांना पक्की घरं दिली जातील पण ही घोषणाही हवेतच राहिली. मोदी सांगतात गॅरंटी आहे पण ती काही खरी नाही, त्याचा अनुभव अनेकदा आला आहे असा हल्लाबोल शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला.

संसदेत काही लोक घुसले, ते घुसून काहीतरी मागणी करत होते नंतर सभागृह बंद झालं. त्यावर आमच्या खासदारांनी पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्र्यांनी संसदेला यासंदर्भात माहिती द्यावी अशी मागणी केली पण त्याला परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षांच्या आग्रही भूमिकेचा परिणाम १४६ खासदारांना संसदेतून निलंबित केले. देशात बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्य नागरिकांचे विषय आहेत. गॅस दर ११०० रुपये झाला आहे. अन्नधान्य महाग झालं असल्याकडे लक्ष वेधले. आपण आता १४० कोटीच्या पूढे गेलो आहोत. यातील ५४ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. शेतकऱ्याची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतकऱ्याचा बोजा कमी करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता. मात्र त्यावर काम होतं नाही. एका बाजूने किंमत द्यायची नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर बंधने आणायची त्यामुळं जनता अडचणीत आली आहे. शेतकरी आत्महत्या संख्या लक्षणीय वाढली आहे.

 

समाजामध्ये आज एक प्रकारची अस्वस्था दिसून येत आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली आहे. या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण होणे गरजेचे आहे पण ही मागणी पूर्ण करताना ओबीसी घटकावर अन्याय होता कामा नये. कुणाच्या ताटातून काढून घेण्याची भूमिका असू नये.

 

मनोज जरांगे पाटील आणि माझी भेट झाली होती. त्यांनी मला सांगितलं की, सरकारशी बोलणी सुरु आहे मात्र त्यानंतर राज्य सरकारने त्यांना लिखीत स्वरुपात आश्वासन दिले. आरक्षणाचा लाभ तुमच्या सग्यासोयऱ्यांसह सगळ्यांना मिळेल, अशी मागणी सरकारने मान्य केली होती. त्यामुळे आता मराठा समाजाला आपली फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुढील चार-आठ दिवसांमध्ये राज्य सरकार काहीतरी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. चंद्रकांत पाटील कालपरवा म्हणाले की, एक वर्ष तरी कमीत कमी वेळ लागेल असे असताना मुख्यमंत्री मात्र २४ तारखेची वेळ देत आहेत.

 

बारामतीला धनगर समाजाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर आरक्षण देण्याचं म्हटलं होतं. आज ९ वर्षे झाली तरी त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. आमचं सरकार असताना आम्ही मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यांना आरक्षणाची गरज असून त्यांनाही पुढे जाण्याची संधी दिली गेली पाहिजे. पण त्यानंतर आमचं सरकार बदललं आणि मुस्लिमांचं आरक्षण गेलं. सध्याच्या सरकारची भूमिका समाजातील लहान घटकांना मदत न करण्याची आहे. त्यामुळे सध्या देशात फक्त गाय, गोमूत्र आणि गोळवलकर एवढंच दिसत आहे. खरं तर आरएसएसची विचारधारा रुजवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *